रोहा (प्रतिनिधी) वाढत्या वृक्षतोडी, वणव्यांनी जंगलांचे झालेले टक्कल, रस्त्यांचे सर्रास काँक्रिटीकरणाने रोहा शहर, परिसरात उष्णतेच्या लाटेने अधिकच उच्चांक गाठले. घोसाळे, खांब विभाग उघडा डोंगरांनी चांगलेच तापले. त्याचा फटका पशुसह माणसांना बसत असल्याचे भयान वास्तव असतानाच वरसे येथील एका तरुणाचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी समोर आली. त्यामुळे दुपारच्या उष्ण तापमानात काळजी घ्या, उन्हात फिरू नका असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत असतानाच वरसे येथील कमल चौहान वय ३४ या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाजारात जात असताना कमल चौहान याला अचानक चक्कर आली. उपचारार्थ रुग्णालयात नेण्यापूर्वीच चौहान याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितल्याने सर्वांनी काळजी घ्यावी हेच समोर आले आहे.
रोहा शहर, परिसरात चारपाच दिवस ४२,४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचा फटका पशु व माणसांना बसत आहे. त्यातच वाढत्या तापमानाने कमल चौहान याचा बळी घेतला. रोहा ग्रामीण रुग्णालयात कमलचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी रोह्यात घेतला असल्याची नोंद झाली आहे.