रोहा (प्रतिनिधी) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. सुनिल तटकरेंना चक्रव्यूहात अड़विण्याचे डाव मित्रपक्ष कॉंग्रेसने आखल्याचे अधिक स्पष्ट झाले. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसी कॉंग्रेस बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवत राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरेंना जोर का झटका दिला. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, कॉंग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा कॉंग्रेस अध्यक्ष मुईज शेख यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होईल, त्यातच मुस्लिम मतांत मोठ्या प्रमाणात विभागणी होण्याची शक्यता, दुसरीकडे मुस्लिम उमेदवार अकमल कादरी यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरेंना बसणार आल्याचे राजकीय जाणकरांतून बोलले जाते. रोहा कॉंग्रेस वगळता ताकद असलेल्या माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन कॉंग्रेसने खा.सुनिल तटकरेंच्या विरोधात दंड थोपटल्याने तटकरेंना कितपत धक्का बसणार ? हे निकालातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुंबईचे पार्सल मुंबईला परत पाठवा असे जाहीर आव्हान देणाऱ्या खा. सुनिल तटकरेंना हेच मुंबईचे पार्सल अधिक डोईजड होणार नाही ना ? अशी चर्चा दक्षिण रायगडात सुरु आहे. तर आता महायुतीचा ‘सामना’ राष्ट्रवादीसाठी धगधगती आग वाटणार नाही ना ? असेही सामना जाळण्याच्या घटनेवरून सर्वत्र बोलले जात आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांसह दोघांनी उमेदवारी दाखल केली. त्या सर्व बंडखोरांना तटकरेंचे डावपेच शांत करतील, अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसचे बंडखोर उमेदवारी ज्ञानदेव पवार, दानिश लांबे, मोईज शेख यांनी अर्ज कायम ठेऊन श्रीवर्धन मतदारसंघाची उमेदवारी काँगेसला द्यायला हवी होती. जागेवर काँग्रेसचा हक्क होता हे अप्रत्यक्ष दाखवून दिले. श्रीवर्धन मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचे होते. माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुलेंच्या राजकीय उत्तरधार्त राष्ट्रवादीने उमेदवारीवर जबरदस्त दावा केला. हा दावा प्रत्यक्षात बॅ.ए.आर.अंतुलेंनाही मानवले नाही. अंतुले यांनी जागेबाबत आक्षेप घेतला होता. मात्र सुनिल तटकरेंच्या राजकीय खेळीपुढे बॅ.अंतुलेंचे काहीच चालले नाही, अंतुले अनेकदा हताश झाले असे त्यांनी स्पष्ट केले होते. अंतुलेंचे चालले नाही तिचे इतर काँग्रेसच्या नेत्यांचे काय ? याच घडामोडीत श्रीवर्धन विधानसभेची जागा अनपेक्षीत राष्ट्रवादीकडे गेली आणि श्रीवर्धन विधानसभेची जागा परंपरागत राष्ट्रवादीची झाली. पण आजही मुख्यतः माणगांव, म्हसळा कॉंग्रेसच्या नेत्यांना तटकरेंचे अतिक्रमण मान्य नाही. श्रीवर्धन विधानसभा जागेवर कोंग्रेसचाच हक्क आहे, हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कॉंग्रेसच्या बंडखोरांनी दाखवून दिले आहे.
श्रीवर्धन विधानसभा निवसणुकीसाठी राष्ट्रवादी आघाडीकडून आदिती तटकरे, शिवसेना माहायुतीचे विनोद घोसाळकर, कॉंग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव पवार (अपक्ष) संतोष पवार (अपक्ष) मुईज शेख(अपक्ष) भास्कर कारे (अपक्ष) सूमन सकपाळ (बहुजन समाज पक्ष) अकमल कादरी (मुस्लिम लीग पार्टी) रामभाऊ मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी) हेमंत देशमुख (अपक्ष) विनेश घोसाळकर (अपक्ष) महेक पोपेरे (अपक्ष) गीता वाढई (अपक्ष) संजय गायकवाड (मनसे) दानिश लांबे (कॉंग्रेस बंडखोर अपक्ष) देवचंद्र म्हात्रे (अपक्ष) असे पंधरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पैकी अपक्ष हेमंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर कॉंग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव पवार व अन्य दोघांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत मोठी वाढ झाली. आधीच राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंच्या अर्जाच्या आक्षेपात मुस्लिम लीगचे अकमल कादरी यांनी उच्च न्यायाल्याचे दरवाजे ठोठावले. आदिती तटकरेंच्या प्रतिज्ञापत्रात रोहा पोलीस ठाण्यातील गुन्हा उल्लेख नाही. सामना वृत्तपत्र जाळण्याच्या घटनेत जमावबंदीचा आदेश तटकरेंनी धुडकावला होता. त्याबाबत याचिका दाखल करण्याच्या संकेताने राष्ट्रवादीने धास्ती घेतली असतानाच काँग्रेसच्या बंडखोरांची अधिक भर पडली. मुळात खा. सुनिल तटकरेंनी सबंध जिल्ह्यात काँग्रेसच्या अस्तित्वावर घाला घातला. त्या काँग्रेसचे अस्तित्व आम्हाला टिकवायचे आहे. त्यासाठी श्रीवर्धन विधानसभेची उमेदवारी काँग्रेसला द्या, असे म्हसळा येथे आयोजित पाच तालुक्याच्या काँग्रेस मेळाव्यात ठरले होते. तरीही खा. सुनिल तटकरेंनी श्रीवर्धनवर हक्क सांगत कन्या आदिती तटकरेंना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविली. त्यानंतर रायगड काँग्रेसकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचे आदेश धुडकावत उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार व इतर दोघांनी बंडखोरी करत तटकरेंना सोमवारी आव्हान दिल्याचे अधोरेखीत झाले. काँग्रेसच्या बंडखोरांची उमेदवारी कायम ठेवल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार ? असे बोलले जात आहे. तर काँग्रेसची हीच सामूहिक बंडखोरी शिवसेना महायुतीच्या पथ्यावर पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.