महाड (वार्ताहर) शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये असे आव्हान त्यांच्या पत्नी श्रीमती शर्मिला कालगुडे यांनी केले आहे. सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूनंतर दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूचा विषय उपस्थित करून राजकीय दृष्ट्या फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे .मात्र कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शिवसेनेच्या पाठीशी निवडणुकीमध्ये ठामपणे उभे रहावे असे श्रीमती शर्मिला कालगुडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना स्पष्ट केले आहे.
सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा कायम ठेवण्यात आला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांनी वाळण बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना संघटना वाढविण्याचे काम केले आहे. त्यांच्या पच्यात सुरेश कालगुडे यांचे संपूर्ण कुटुंब शिवसेना संघटनेतच कार्यरत आहेत. मात्र सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूला एक वर्ष देखील पूर्ण झाले नसल्याने आपण शांत आहोत. सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूची चौकशी व पाठपुरावा करण्याकरिता आपण सक्षम आहोत असे देखील शर्मिला कालगुडे यांनी सांगितले असून शिवसेनेचे आ. भरत गोगावले व सुरेश कालगुडे यांचे नाते हे जवळचे होते. मात्र कालगुडे यांच्या मृत्यूनंतर केले जाणारे राजकारण दुर्दैवी असून सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये असे आव्हान करतानाच शिवसेना वाळण विभागप्रमुख ते रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते या राजकीय प्रवासामध्ये शिवसेना संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या सुरेश कालगुडे यांची पत्नी म्हणून आपण भविष्यात शिवसेना संघटनेत कार्यरत राहणार असल्याचे शर्मिला कालगुडे यांनी स्पष्ट केले.