रायगड पोलीस सुतारवाडीची झाड़ाझड़ती घेतील का ? आ. दरेकर यांचा आक्रमक सवाल

Share Now

1,375 Views

पेण (देवा पेरवी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा.सुनिल तटकरे यांचे रायगड जिल्हयात सुरु असणारे सुडाचे राजकारण कदापी सहन करणार नाही, त्यास यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.प्रविण दरेकर यांनी पेण येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात बोलताना दिला.

भाजप आ. रविशेठ पाटील यांचे सुपुत्र तथा पेेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील व मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यात काही दिवसांपूर्वी अनाधिकृत बांधकामासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती. माञ मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत अनिरुद्ध पाटील यांच्यावर पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याच्या निषेधार्थ पेण शहरात आज भाजपच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चात विरोधी पक्ष नेते आ.प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री आ.रविंद्र चव्हाण, आ.रविशेठ पाटील, आ.प्रशांत ठाकूर, आ.निरंजन डावखरे, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष ॲड.महेश मोहिते, जेष्ठ नेते बाळाजी म्हात्रे, अरुण भगत, आरपीआयचे कोकण विभागीय अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, सचिव बंडू खंडागळे, अविनाश कोळी, अमीत घाग, राजेश मपारा, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, पनवेल महापालिकेचे सभापती संतोष शेट्टी, अनिता पाटील यांच्यासह भाजप व इतर पक्षांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपूर्ण पेण शहरातून हा मोर्चा फिरल्यानंतर शेवटी नगरपालिकेसमोर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुढे बोलताना आ.प्रविण दरेकर यांनी सांगितले की, तटकरेंची ही प्रवृती असून सत्तेच्या माध्यमातून जिल्हयाची संस्कृती बरबाद केली जात आहे, जिल्ह्याचा विकास थांबला आहे, नगरपालिकेच्या सभेत प्रश्न मांडताना जोरात बोलले एवढाच विषय होता, मात्र राष्ट्रवादीने सूडाचे राजकारण करत गुन्हा दाखल करायला लावता. तर पोलिस आमदारांच्या घराची झडती घेतात, काय अधिकार आहे, याचाही जाब आपण विधीमंडळात विचारणार असून रायगड पोलिस सुतारवाडीची झडती घेतील का ? असाही सवाल केला. सत्ता चंचल असते, पोलिसांनी व्यवस्थितपणे काम करावे, हे सरकार तीन टेकूचे आहे ते कधी कोसळेल सांगता येत नाही असे सांगून भाजप हा लेच्यापेच्या पक्ष नसून, यापुढे राष्ट्रवादीला जशासतसे उत्तर देऊन तुम्हाला तुमची जागा दाखविली जाईल असाही इशारा दिला. रायगड जिल्हयात सेनेचा भगवा शिल्लक राहिल का ? कारण तटकरें सारखा भस्मासूर सेनेने जवळ केला आहे. तटकरे जिल्हयाचा विकास करा, असले सूडाचे राजकारण आम्ही कदापि सहन करणार नाही. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार. जिल्ह्याचे राजकारण मोडू पाहत आहात पण भाजप गप्प बसणार नाही असेही दरेकर यांनी शेवटी सांगितले.

आ.रविशेठ पाटील यांनी सांगितले की, जर असे खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर मग जनतेचे प्रश्न कुठे सुटणार ? तटकरेनीं हवा भरली, हे पेणमध्ये खपवून घेणार नाही. येत्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार. कोणता गुन्हा होता ? माझ्या घराची झडती घ्यायची तुमची हिम्मत कशी झाली. या सर्व प्रकाराचा बोलवता धनी सुनिल तटकरे हेच आहेत. रोह्याची नगरपालिका बघा आणि पेणची बघा, किती विकास पेणचा झाला आहे. अर्थ खातं असताना पेण अर्बन बँकेसाठी एक रुपया दिला नाही. आगरी ही बोली भाषा आहे, पण तिची बदनामी सहन करणार नाही. यापुढे एकसंघी राहून पेणच्या विकासासाठी कटीबध्द असणार आहे. फडणवीस यांनी निधी दिला, पण तटकरेनीं एकही रुपया दिला नाही. बाळगंगा, कोंढाणा धरणाचे काय केले याचे उत्तर तटकरेनीं द्यावे असेही रविशेठ यांनी स्पष्ट केले. आ.प्रशांत ठाकूर यांनी जिल्हयात तटकरे दबावशाहीचे राजकारण करत आहेत. भाजप असे राजकारण कधीही करत नाही. शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. माञ तटकरे हे जिल्ह्याचे मालक म्हणून वावरत आहेत, पण काळ त्यांना त्यांची जागा दाखवुन देईल. तिघाडीचे सरकार आहे तो तिढा पहिले सोडवा. भाजपच्या वाट्याला का जाता ? असा सवाल एका आमदाराच्यां निवासाची झडती घ्यायला जाता, कुठला गंभीर गुन्हा केला आहे. ही दडपशाही सुरु आहे, पण सहन करणार नाही, त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा प्रशांत ठाकूर यांनी दिला.

आ.रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, यापुढे दडपशाही चालली नाही पाहिजे, घटनेने दिलेले अधिकार वापरले पाहिजेत, त्याची पायमल्ली करु नका, पोलिस खात्याने प्रथम त्या गुन्ह्याची चौकशी करायला पाहिजे, सभेत काय झाले, उपस्थित अधिका-यांची विचारपूस करावी, गुन्हेगार असेल तर ठिक आहे. जर एखादी महिला अशा प्रकारे काम करत असेल तर चुकीचे आहे. अनाधिकृत बांधकामा संदर्भात कारवाई करत नसेल तर विचारपूस करणे हे चुकीचे आहे का ? शासनाने अशा अधिक-यांची बदली करावी, तटकरे हे स्वतःच पालकमंत्री म्हणून काम करत आहेत. आम्ही कुणावरही खोटे गुन्हे दाखल केले नाहीत, भाजपची एक विचारधारा आहे. विकासाच्या नावाखाली बोंबाबोब सुरु आहे, भाजप शञू असेल तर मग भाजपच्या जीवावर आमदार झालेल्या आनिकेत तटकरे यांनी प्रथम आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा असे सांगून गटनेते अनिरुद्ध पाटील यांना कलम 169 मधून सोडावे आणि याप्रकरणी संबंधित अधिका-यांची चौकशी करावी अशी मागणी केली.

स्थायी समितीच्या बैठकीत अनाधिकृत बांधकामा संदर्भात विचारले म्हणून राष्ट्रवादीच्या राजकीय दबावापोटी गटनेत्यांवर मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असल्याचे नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी सांगितले. तर माजी मंञी रविशेट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेणचा विकास केला असून पुढेही करु असे पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी प्रास्ताविकपर बोलताना सांगितले. ॲड.महेश मोहिते यांनी बोलताना सांगितले की, आत्तापर्यंत गरज लागल्यावर तटकरेनीं रविशेठ पाटील यांचे पाय किती वेळा धरले ? याचे उत्तर द्यावे, सत्ता जाते येते, पण यापुढे तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असे स्पष्टपणे सांगितले. जगदिश गायकवाड यांनी जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही भांडतो असे सांगितले, मग प्रत्येक वेळी 353 कलम लावणार का ? असा सवाल केला. सज्जन माणसाची झडती घेता काय हे कसले घाणेरडे राजकारण खेळता , सत्य तपासून काढा, पोलिसांनी तटकरेंच्या घराची झडती घ्यावी म्हणजे तुम्हाला अख्खा सिंचन घोटाळ्याचे पैसे मिळतील असेही आरोप केले. सदर मोर्चाला पेणसह रायगड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *