रोहा (वार्ताहर) कविवर्य कालिदास जयंतीनिमित्त
साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड तफॅ रोहा येथे आयोजित सहविचार सभा व कविसंमेलन संपन्न झाले अशी माहिती साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडच्या जिल्हाध्यक्षा, गजलकार व कवयित्री सौ. संध्या विजय दिवकर यांनी दिली. कोकणातील सुप्रसिद्ध जेष्ठ गजलकार स्व. मधुसुदन नानिवडेकर, रा. कणकवली जि. सिंधुदुर्ग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यकमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहित्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक,महाराष्ट्राचे गजलकार, कवी, लेखक, संगीतकार श्री विजय वडवेराव यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमास अधिक रंगत आली. साहित्यानंद प्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष बा.ह. मगदूम आणि साहित्यानंद प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमोल तांबे हे सुदधा या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. साहित्यानंद प्रतिष्ठानचा मूळ उद्देश म्हणजे साहित्य आणि संगीत यांचा प्रसार व प्रचार करणे तसेच साहीत्य विश्वातील नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन देवून हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम साहित्यानंद प्रतिष्ठान ही संस्था करते असा विश्वास साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडच्या जिल्हाध्यक्षा सौ. संध्या दिवकर यांनी आपल्या प्रस्ताविकात दिला.
गडदुर्ग अभ्यासक, रायगड भूषण व को .म. सा.प. शाखा रोहाचे अध्यक्ष सुखद राणे यांनी आपल्या मनोगतातून साहित्यानंद प्रतिष्ठानच्या कार्याला प्रोत्साहन दिले. तसेच माजी नगरसेवक मुरुड जंजिरा, को.म.सा.प. दक्षिण रायगडचे अध्यक्ष कवी, संजय गुंजाळ यांनीही अतिशय मोजक्या शब्दात साहित्यानंद प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास अगदी मोजक्याच कवींनी कोरोनाचे सर्व नियम पाळून हजेरी लावली व अतिशय देखणा दर्जेदार कवितांचा आनंद देण्याचा प्रयत्न केला. हनुमंत शिदे, सुकुमार पाटील, क्षिरसागर सर, शरद कदम, अमोल तांबे, बा .ह . मगदूम, रघुनाथ पोवार, सौ. संध्या दिवकर इ . कवी कवयित्रींनी पावसाच्या सुरात सूर मिसळून साहित्याचा आनंद द्विगुणीत केला. या कार्यक्रमास पत्रकार राजेंद्र जाधव, हजारे यांनी उपस्थिती लावली.
“काळजाने काळजाशी थेट असले पाहिजे
एवढे हिरवे मनाचे बेट असले पाहिजे” असे काळजाला थेट भिडणारे एका पेक्षा एक शेर. ज्यांच्या मुक्तछंद कविता, सामाजिक ग्रामिण कविता आणि गजल अगदी मुक्तपणे हातात हात घालून विहरताना दिसतात असे महाराष्ट्राचे गजलकार विजय वडवेराव यांनी आपल्या रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या “बाप” या अप्रतिम कवितेने तर सारेच भारावून गेले.
साहित्यानंद प्रतिष्ठानचे कार्य एकूण तेरा जिल्ह्यात सुरु आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक बेळगाव येथे सुद्धा साहित्यानंद प्रतिष्ठान संस्था कार्यरत आहे. आपण सारे साहित्याच्या वाटेवरचे सहप्रवासी आहोत. इथे कुणी कुणाचा स्पर्धक नाही तर साहित्याचा आनंद मिळविण्यासाठी माणसाने माणसे जोडली पाहिजेत असे
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय वडवेराव यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वसंत दिवकर यांनी केले.