अष्टमी (महेंद्र मोरे) रोहे रेल्वे स्थानकावरून सुटणारी रोहा दिवा मेमु सेवा तात्काळ सुरु करावी. यासह रोहा स्थानकावर कोरोना आधी थांबणाऱ्या सर्व मेल,एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुर्ववत करावेत या मागण्यांचे निवेदन रोहा रेल्वे संघर्ष समितीने मंत्रालयातील परिवहन सचिव व मध्य रेल्वे मुंबई विभागाचे जनरल मॅनेजर यांना दिले आहे.शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले. यावेळी रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सचिव उदय शेलार, समन्वयक संकेत घोसाळकर, आग्रही कार्यकर्ते उल्लास मुद्राळे, विशेष सल्लागार गणेश मासक, खजिनदार विनोद सावरकर हे सर्व उपस्थित होते.
मध्य रेल्वे वरील रोहा मधून सुटणारी रोहा-दिवा-रोहा मेमु मागील एक ते दीड वर्षांपासून कोरोनामुळे सामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. यासोबतच रोहा स्थानकावर थांबणाऱ्या दादर रत्नागिरी,दिवा सावंतवाडी या प्रवासी गाड्यांसह नेत्रावती व अन्य लांब पल्याच्या गाड्यांचे थांबेही रद्द करण्यात आले आहेत. यामुळे रोहे स्थानकासह पनवेल पर्यंतच्या सर्व स्थानकांवरील प्रवाश्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच बहुतांशी रेल्वे सेवा आता पुर्वपदावर येत आहे असे असताना प्रवाशांची मागणी असूनही रोहा रेल्वे स्थानकावरील सेवा अजूनही सर्वसामान्य प्रवाशांच्या साठी बंदच आहे. रोहा रेल्वे संघर्ष समिती वारंवार प्रवाश्यांना ही सेवा पुर्ववत करावी याचा पाठपुरावा करत आहे. त्याच अनुषंगाने २४/०९/२०२१ रोजी रेल्वे संघर्ष समिती रोहा सदस्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालय इथे थेट जाऊन तसेच मध्य रेल्वे जनरल मॅनेजर श्री अनिल कुमार लाहोटी यांच्या कार्यालयात जाउन रोहेकरांची जीवनवाहिनी असलेली रोहा-दिवा-रोहा प्रवाशांसाठी लवकरात लवकर सुरू करावी यासाठी भेटून निवेदन दिले आहे.यासोबतच तसेच दिवा-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी आणि इतर एक्सप्रेस गाड्याना रोहा येथे थांबा देण्यात यावा यासाठी निवेदन दिले आहे. पनवेल-वसई-दिवा मेमु च्या धर्तीवर रोहा-दिवा मेमु देखील लवकर सुरू होईल अशी आशा संघर्ष समितीच्या सदस्यांनी केली, त्यामुळे रोहेकर प्रवाशांचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.