रोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील प्रदूषण, सीईटीपी, प्रस्तावित रस्ते यांसह अनेक मुद्द्यांवर खा. सुनिल तटकरे यांनी कंपनी सबंधीत सर्वच अधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी रोहा येथे बैठक घेतली. त्या बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी संजय नलावड़े, एमपीसीबीचे व्ही किल्लेदार, आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर, मोजके लोकप्रतिनिधी सर्वच कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तसे पत्र संबधीत कंपनी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तरीही महत्वाच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दुसरीकडे खा.तटकरे यांनी बंद दाराआड गुप्त बैठकीला का बोलविले ? याबाबत खुद्द अधिकारी संभ्रमात होते. बैठकीबाबतच्या पत्रात मुद्यांचा उल्लेख करण्यात आले नाही. याच चर्चेत पत्रकारांनाही बैठकीपासून कोसा दूर का ठेवले असा सवाल आता उपस्थित झाला आहे. रोठबुद्रुक अंतर्गत रस्ता, मजदा निलिकॉन मध्यान प्रलंबित रस्ता, ट्रक टर्मिनल मुद्द्यांवर मुंबई येथिल बैठकीला महत्त्वाचे पत्रकार उपस्थित होते. अशात शुक्रवारच्या बैठकीपासून पत्रकारांना का दूर ठेवण्यात आले, खासदारांच्या चर्चेत नेमके काय घडले, गुप्तगू बैठकीत उशिरा पालकमंत्री अदिती तटकरेंनी सहभाग घेतला, त्यामुळे बैठकीत अधिक काय घडले ? याबाबत कामगार, विविध क्षेत्रातील मान्यवर, विरोधी पक्षात संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
धाटाव एमआयडीसीतील अनेक विषय कायम प्रलंबीत व चर्चेत आहेत. जल वायू प्रदूषणाचा मुद्दा सतत ऐरणीवर येत आहे. त्यातच धाटाव, रोठ बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसीच्या रस्त्याच्या दुतर्फावर अतिक्रमण सुरुच आहे. सर्वच पक्षाचे स्थानिक प्रमुख अतिक्रमण करीत गाळे बांधत सुटले. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण बांधकामे वाढल्यास भविष्यात चित्र भयानक दिसेल, याकडे आमदार, खासदार नेहमीच सोईस्कर दुर्लक्ष करीत आहेत. रस्ता दुतर्फा गाळे अतिक्रमणाबाबत पालकमंत्री आदिती तटकरेंशी आठवड्यापूर्वीच सलाम रायगडने चर्चा केली. त्यावर तटकरेंनी फारच ओघम उत्तरे दिली. याच धर्तीवर शुक्रवारी सायंकाळी खा. सुनिल तटकरेंनी कंपन्या सबंधीत सर्वच अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीत रस्ताकडेच्या अतिक्रमणाचा विषय सोयीस्कर वगळून प्रदूषण, सीईटीपी, प्रलंबित रस्ते, कोलाड रोहा रस्त्यावर पथदिवे विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली. याच बैठकीत प्रकल्पग्रस्त हा नवा मुद्दा चर्चेत आला. कंपन्यांच्या उभारणीला आज ५० वर्षे पूर्ण झाले. किमान २० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त हा मुद्दा कधीच उपस्थित झाला नाही. मग प्रकल्पग्रस्त हा मुद्दा अचानक कसा आला, नक्की कोण प्रकल्पग्रस्त असतील ? याची सर्वांनाच उत्सूकता लागली आहे.
आयोजित बैठकीत प्रदूषण, सीईटीपी सांडपाणी वाहिनी साळाव समुद्रात सोडणे. प्रस्तावीत अंतर्गत रस्ते, पथदिवे, ट्रक टर्मिनल विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांजवळ खासदारांनी कानोपानी चर्चा केल्याचेही नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले. महत्वाच्या चर्चेवरील बैठकीला पत्रकारांना प्रथमच का डावलण्यात आले, याबाबत स्पष्टीकरण कोणाकडून अद्याप झालेले नाही. महत्वाच्या बैठकीला पत्रकारांना का दूर ठेवण्यात आले, प्रकल्पग्रस्त हा नवीन मुद्दा कोणत्या आधारावर आला, प्रकल्पग्रस्त मुद्दा प्रथमच चर्चेत आणला गेला की प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळाले नाही, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, खा. सुनिल तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी गुप्त चर्चा का केली, त्यातून नेमके फलीत काय ? हे लवकरच समोर येईल तर एमआयडीसीच्या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण गाळा मुद्दा उपस्थित का करण्यात आला नाही, खासदार मुख्यतः राज्य उद्योग खाते असलेल्या पालकमंत्री अदिती तटकरे अतिक्रमण मुद्यावर गंभीर का नाहीत ? याबाबत बैठकीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.