धावीर रोड (अंजूम शेटे) एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी दि. 8 नोव्हेंबरपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा तोडगा निघाला नसला तरी शासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत रोहा आगारातून शुक्रवार दि. 26 नोव्हे. सकाळी 11 वा.पासून रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती आगर प्रमुख सोनाली कांबळे यांनी दिली आहे. ग्रामीण भागात एस.टी सेवा सुरु झाल्याने समान्य प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
रोहा आगारामध्ये एकुण 244 कर्मचारी असून त्यातील आतापर्यंत 25 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. शुक्रवारपासून रोहा तालुक्यातील विरझोळी, नागोठणे, चणेर, कोलाड अशा फ़ेऱ्यांना सुरुवात झाली असून एस.टीच्या 4 वाजेपर्यंत एकून 56 फ़ेऱ्या झाल्या आहेत. सदर एस.टी.वाहतूक सेवा रोहा आगारप्रमुख सोनाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. जे कामावर आले त्यांना कामावर रुजू करण्यात आले असल्याची माहितीही कांबळे यांनी दिली. तसेच एस.टी. वाहतूक सेवेचा लाभ पूर्वीसारखे सर्व प्रवाशांनी घ्यावे असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे. दरम्यान, ऐन दिवाळी सणात एस.टी कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून पुकारलेल्या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना खाजगी वाहतूक सेवेचा वापर करावे लागले. ज्यामुळे प्रवाशांना नाहक अतिरिक्त भुर्दड सोसावे लागले. आता एस.टी सेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला आहे.