पेण (देवा पेरवी) शेतकरी कामगार पक्षाचा पेणचा कार्यकर्ता पेटून उठला असून आगामी सर्वच निवडणुकीत तालुक्यात लालबावटा पुन्हा अभिमानाने फडकवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा शेकाप जिंकणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पेण येथे केले.
शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन वडखळ येथे 2 ऑगस्टला साजरा करण्यात येणार असून यानिमित्त पेण येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस ॲड.आस्वाद पाटील, शेकाप नेत्या ॲड. निलिमा पाटील, भाऊ एरणकर, जि.प.सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, पेण तालुका चिटणीस संजय डंगर, सुरेश खैरे, प्रसाद भोईर, सुरेश पाटील, संदेश ठाकूर, के.डी.पाटील, प्रफुल पाटील, समिर म्हात्रे, शोमर पेणकर, स्वप्निल म्हात्रे, अमित पाटील, काशिनाथ पाटील, दिलीप पाटील, संजय भोईर, मधुकर पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन अधिकाधिक ताकदीने तसेच पक्षाला उर्जित अवस्था देण्याच्या मार्गाने साजरा करणार आहोत. शेकापक्षाने नेहमीच शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या समस्या मोठ्या निष्ठेने सोडविल्या आहेत. तसेच उरणचे आंदेलन, चरीचे आंदोलन, पेणचे सेझचे आंदोलन यामध्ये शेकापने सहभाग घेवुन जनतेला न्याय मिळवुन दिला आहे. पुढील सर्व निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताच निर्णय घेतला जाणार नाही. पुन्हा एकदा तालुका पेटून उठेल, विरोधकांना आमची ताकद दाखवून देऊ असेही माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले
संघटना पक्ष मोठा असून संघटने पेक्षा कोणी मोठा नाही. भविष्यात शेतकरी कामगार पक्षाला चांगले दिवस येणार आहेत, असे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणिस आस्वाद पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेतला व कार्यकर्त्यांना यासंबंधी मार्गदर्शन केले.