रोहा (राजेंद्र जाधव) रोहा पंचायत गणातील दहापैकी पाच गणात महिला आरक्षीत झाल्या. त्यात वरसे गण अनु.जमाती महिला पाठोपाठ जिल्हा परिषद गटातही प्रथमच अनु.जमाती महिला आरक्षण पडल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह गणासाठीच्या इच्छुक अनेकांच्या मनसुब्यावर अक्षरश: पाणी पडले. पंचायत गण आरक्षण पाठोपाठ जिल्हा परिषद गट आरक्षणानेही तालुक्यातील अनेकांना चांगलेच भिरकावले. नागोठणे, आंबेवाडी, निडी तर्फे अष्टमी, वरसे गटासाठी महिला आरक्षण पडल्याने किशोर जैन, महेंद्र पोटफोडे, एड. मनोज शिंदे, राकेश शिंदे, मधुकर पाटील यांना मोठा झटका बसल्याचे अधोरेखीत झाले. तब्बल चार गटासाठी पडलेले महिला सर्वसाधारण आरक्षण सर्वच पक्षीय नेत्यांसाठी अक्षरशः धक्कादायक ठरले. दरम्यान, एकमेव धाटाव गटासाठी पडलेले सर्वसाधारण आरक्षण कोणाच्या पथ्यावर पडते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेक वर्षानंतर धाटाव गटासाठी पडलेले सर्वसाधारण आरक्षणाच्या संधीचा फायदा नेते विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर यांना मिळतो का, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना वरसे गटाने चकवा दिल्याने पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: धाटाव गटातून पाटील यांना उमेदवारी देऊन केली जाते का, किंबहुना धाटाव एकमेव सर्वसाधारण गटातून पाटील, मोरे की पाशिलकर ? याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.
रोहा जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी धक्कादायक आरक्षण पडले. नागोठणे, आंबेवाडी, वरसे, निडीतर्फे अष्टमी गटासाठी महिला आरक्षण पडल्याने पुरुष नेतेगिरीला दूरवर भिरकावले. आरक्षणाने रोहा राजकारणात महिला राज आणले. राजकारणातील महत्वाच्या वरसे जिल्हा परिषद गटाच्या वरसे, कोकबण गणात महिला आरक्षण पडल्याने आधीच नेतेगणांचा चेहरा फिक्का पडला. पाठोपाठ वरसे गटासाठीही अनु.जमाती महिला आरक्षण पडल्याने राष्ट्रवादीचे संभावी उमेदवार जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना मोठा झटका बसला. मागील खारगांव जिल्हा परिषद गटातून शेकाप राष्ट्रवादी युती म्हणत पक्षश्रेष्ठींनी मधुकर पाटील यांच्या उमेदवाराला खोडा घालत माघारी बोलावले होते. त्यानंतर आता नेते मधुकर पाटील यांना कोणत्याही गटातून उमेदवारी देत निवडून आणणार, असे ठोस आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याने एकमेव सर्वसाधारण धाटाव गटातून मधुकर पाटील यांना उमेदवारी दिले जाण्याचे संकेत मिळत आहे. मात्र सर्वसाधारण आरक्षण हे विजयराव मोरे, विनोद पाशिलकर यांच्यासाठी खूप वर्षानंतर आलेली संधी आहे. मुख्यतः धाटाव गटासाठी विजयराव मोरे, विनोद पाशिलकर यांना दावेदार मानले जातात, अशात मधुकर पाटील यांना दिलेले आश्वासन तर विजयराव मोरे, विनोद पाशिलकर यांना सर्वसाधारण आरक्षणातून मिळालेली संधी पाहता पाटील, मोरे, पाशिलकर नेमकी कोणाला लॉटरी लागते ? याची तुफान चर्चा गाव वाडीपाड्यात सुरू आहे. आता पक्षश्रेष्ठी आश्वासन पाळतात की हक्कदारांना संधी देतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हा परिषद गटाच्या ४४ नागोठणे सर्वसाधारण महिला, ४६ निडीतर्फे अष्टमी सर्वसाधारण महिला, ४७ वरसे अनु.जमाती महिला, ४५ आंबेवाडी सर्वसाधारण महिला तर एकमेव ४२ धाटाव गटात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने चार महिला आरक्षण गटातील अनेकांना संधी गमावावी लागली. नागोठणे सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, शेकापमधील इच्छुक नेतेगणांच्या कोण सौ उभ्या राहतात, हे समोर येणार आहे. निडीतर्फे अष्टमीत सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने शिवसेनेचे उमेदवार ॲड. मनोज शिंदे, शेकापचे गणेश मढवी, नंदकुमार म्हात्रे यांची दांडी गूल झाली आहे. आंबेवाडी गटात सर्वसाधारण महिला आरक्षणाने महेंद्र पोटफोडे, राकेश शिंदे, नरेंद्र जाधव, राकेश शिंदे यांच्या मनसुब्याला मोठा झटका बसला. महिला आरक्षण असल्याने कोणाच्या सौं’ला उमेदवारी मिळते, दुसरीकडे शिवसेनेकडून चेतना लोखंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. वरसे जिल्हा परिषद गटासाठीही अनु.जमाती महिला आरक्षण पडल्याने हक्काचे दावेदार मधुकर पाटील यांना जोर का झटका बसला. मूळात वरसे गट, गणासाठी प्रथमच अनु.जमाती महिला आरक्षण पडल्याने प्रत्यक्ष राजकारण करणाऱ्या गाव वाडीपाड्यातील नेत्यांना दूरवर भिरकावले. आता वरसे गट, गणासाठी कोणत्या अनु.जमाती महिला उमेदवारावर शिक्कामोर्तब होते याची प्रतिक्षा आहे. एकमेव सर्वसाधारण धाटाव गट, गणात उमेदवारीची चुरस पाहायला मिळणार आहे. गटासाठी विजयराव मोरे, विनोद पाशिलकर दावेदार मानले जात असतानाच नेते मधुकर पाटील यांना धाटाव गटातून उमेदवारी दिली जाते का ? याच चर्चेत गट, गणात सामंजस्य उमेदवारीचा तोडगा काढण्याचे अप्रत्यक्ष संकेत मिळत आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना जिल्हा परिषद गटाची उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले, त्या आश्वासनाची पूर्तत: यांसह खूप वर्षानंतर गटासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने विजयराव मोरे, विनोद पाशिलकर यांना हक्काचा मतदारसंघानुसार न्याय विचारात घेता नेमके काय नाट्य घडते ? याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.