रोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील अपघात घटनांत कायम अग्रेसर असलेल्या प्रख्यात एक्सेल इंडस्ट्रियल कंपनीत शनिवारी सायंकाळी घातक रसायनाचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली. कंटेनरमधील घातक रसायन ड्रममध्ये खाली करत असताना रसायनाने अचानक पेट घेतला आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. रसायनच्या स्फोट अपघातात २ कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे ऐरोली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर स्टाफसह ४ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, एक्सेल कंपनीत एकदोन वर्षाच्या फरकात सतत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मागील स्फोट अपघातात तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. कामगाराच्या मृत्यू प्रकरणी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच अपघात घटनांच्या मालिकेत शनिवारी पुन्हा भर पडली. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला एक्सेल प्रशासन कितपत न्याय देते ? याच चर्चेत कारखाना निरीक्षक केशव केंद्रे यांनी रविवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली, त्यामुळे एक्सेल अपघात प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई होते का ? हेही लवकरच समोर येणार आहे.
धाटाव एमआयडीसीतील एक्सेल कंपनी आणि अपघात हे सातत्याचे झाले आहे. विषारी वायू, जल प्रदूषण करण्यात कायम आघाडीवर असलेल्या एक्सेल कंपनीला अपघात नवे नाहीत. याउलट वायू, जल प्रदूषणाबाबत एक्सेल कंपनीला अधिक मुभा देणाऱ्या एमपीसीबी प्रशासनही वारंवार चर्चेत आले. मागील महिन्यात वायू प्रदूषणासाठी एमपीसीबीने अप्रत्यक्ष दोषी धरलेल्या एक्सेल कंपनीत शनिवारी सायंकाळी घातक रसायनाचा स्फोट झाल्याने एकच हाहा:कार उडाला. कंटेनरमधील घातक रसायन ड्रममध्ये खाली करत असताना हा अपघात झाला. लाकडी हातोडा न वापरता लोखंडी हातोडा वापरल्याने रसायनाने अचानक पेट घेतला. त्यातून लगेचच मोठा स्फोट झाला, अपघातात तब्बल ६ कामगार जखमी झाल्याची घटना घडली. त्यातील ४ कामगार किरकोळ जखमी झाले, तर गंभीर जखमी झालेल्या रामचंद्र ढमाल सांगड़े, हरेश तळकर कोलाड या कामगारांवर ठाणे ऐरोली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही जखमी कामगारांची नावे अद्याप समोर आली नाहीत. स्फोटक अपघाताबाबत रोहा पोलीस प्रशासनाकडे अजुन पुरेशी माहिती आलेली नाही, ऐरोली येथून माहिती आल्यानंतर घटनाक्रमाची चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली. घटनेतील गंभीर जखमी रामचंद्र ढमाल, हरेश तळकर हे कंत्राटात काम करीत असल्याचे अधिकृत वृत्त उशिरा समोर आले. त्याआधी कंपनीने ४ जण कामगार जखमी त्यातील १ कामगार गंभीर सांगून माहिती लपवल्याची चर्चा सुरु झाली. सलाम रायगडने खोलवर जाऊन खरी माहिती पुढे आणली. रासायनिक ड्रममध्ये गॅस तयार होऊन फॉस्फरसचे खडे अंगावर उडाल्याने कामगार भाजले, असा अधिकृत घटनाक्रम समोर आल्याने एक्सेलमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.
धाटावातील एक्सेल कंपनीत याआधी भयानक स्फोट झाले. त्या स्फोटातील मालिकेत दीपक जिवले, यशवंत जाधव, राजा सकपाळ ह्या तीन कामगारांना जीव गमवावा लागला. घटनेनंतर वातावरण प्रचंड संघर्षाचे बनले होते. एका कामगाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी दोषी धरत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी डेग्वेकर यांसह अन्य अधिकाऱ्यांवर ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झालेला आहे. सतत गंभीर व किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील वर्षी निवी येथील अक्षय बामगुडे हा ठेकेदारीतील कामगार गंभीररित्या भाजला. बामगुडे याला उपचारापलीकडे एक्सेल प्रशासनाने काहीच मदत केली नाही, हा राग आजही ग्रामस्थात असताना पुन्हा शनिवारी घातक रसायनाने ६ जण कामगार जखमी झाल्याची घटना घडली, त्यातील गंभीर जखमी कामगार ठेकेदारीत काम करीत असल्याचे उशिरा समोर आल्याने सर्वच कामगारांच्या कुटुंबीयांना एक्सेल प्रशासन कितपत न्याय देते, ग्रामस्थ न्यायासाठी कितपत आक्रमक होतात ? याचीही चर्चा सुरू झाली आहे. अपघाती घटनेत एकूण सहा कामगार जखमी झाले, त्यात दोन गंभीर कामगारांवर ठाणे ऐरोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे रोहा पोलिसांनी सांगितले, जखमीतील ३ जण कंपनी व्यवस्थापनाचे कामगार असल्याची माहिती उशिरा अधिकृत सूत्रांनी दिली. त्यामुळे स्फोटक अपघातात ४ नाही एकूण ६ जण जखमी झाल्याचे समोर आले. यावर कंपनीला कामगारांच्या सुरक्षेबाबत नक्कीच काळजी आहे, घटनेतील एका जखमी कामगारावर ऐरोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, किरकोळ जखमी कामगारांना घरी सोडण्यात आले, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये याची दक्षता घेतली जाणार आहे अशी प्रतिक्रिया कंपनी प्रशासक हाशिराम मंचेकर यांनी दिली. दरम्यान, शनिवारी झालेल्या स्फोटात तब्बल सहा कामगार जखमी आहेत. त्यातील गंभीर दोघा कामगारांवर ऐरोली येथे उपचार सुरू असल्याचे समोर आल्याने एक्सेल व्यवस्थापन जखमी कामगारांच्या सुरक्षेबाबत दिशाभूल करीत नाही ना ? असाच सवाल उपस्थित झाला, तर एक्सेल कंपनीच्या अपघात दुर्घटनेच्या चौकशीतून नेमके काय समोर येते, दोषींवर काय कारवाई होते, कंपनी निरीक्षक प्रशासन नेमकी काय भूमिका घेते ? हे लवकरच समोर येणार आहे.