उरण : (विठ्ठल ममताबादे )मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली होती. नुकताच या स्पर्धेचा निकाल लागला असून खुल्या गटात ‘मुंबई आणि कोकण’ या विभागातून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन गावचे सुपुत्र तुषार चंद्रकांत म्हात्रे यांच्या विज्ञान निबंधास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विज्ञान प्रसारासाठी काम करणाऱ्या ‘मराठी विज्ञान परिषदे’द्वारे दरवर्षी विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी खुल्या गटासाठी ‘हवामान बदल’ हा विषय निश्चित करण्यात आला होता. या स्पर्धेत मुंबई आणि कोकण विभागातून तुषार म्हात्रे (रायगड) यांनी प्रथम क्रमांक तर मनाली परब (भांडूप) यांस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषकाचे स्वरूप आहे. विज्ञान व इतिहास विषयांवर लेखन करणारे तुषार म्हात्रे हे सुप्रसिद्ध ब्लॉगर असून त्यांच्या ‘तुषारकी’ व ‘द रियान किनारे’ या ब्लॉगवर नियमितपणे विविध विषयांवरील लेख प्रकाशित होत असतात. ‘आम्ही पिरकोनकर सामाजिक संस्थेचे’ सचिव म्हणून काम पाहणाऱ्या तुषार म्हात्रे यांना ‘मुंबई आणि कोकण’ विभागातून सर्वोच्च यश मिळाल्याबद्दल चेतन गावंड (अध्यक्ष) व समूहातील सदस्यांनी तसेच रायगड जिल्हातील विविध सामाजिक संस्था संघटना,उरण मधील विविध सामाजिक संस्था, संघटना, मित्र परिवार, शिक्षक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .विभागीय गटातून निवडलेल्या स्पर्धकांपैकी राज्यस्तरावर मयूर तावडे (जळगांव), राजीव पुजारी (सांगली) यांनी यश संपादन केले.
मुंबई-कोकण विभागात तुषार म्हात्रे यांचे विज्ञान लेखन ठरले सर्वोत्तम
353 Views