पाऊस सुरु झाला नाही तोच नवघर गावात शिरले समुद्राच्या भरतीचे पाणी. सिडकोचे नियोजन शून्य ढिसाळ कारभाराचा उरण मधील विविध गावांना फटका.

Share Now

238 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील मंगळवार दि.१४/०६/२०२२ रोजी नवघर गावात सिडकोच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी संपूर्ण नवघर गावात शिरले आहे. त्यामुळे अनेक मालमत्तेचे, सामानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपुर्ण आपल्या भारत देशासह आपल्या साधु संतांच्या महाराष्ट्राच्या भूमित देखील वर्षानुवर्षे सावित्रीच्या लेकी “वटपौर्णिमा” हा पारंपारिक सण मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करत असताना सिडकोच्या आडमुठ्या धोरणामुळे येथील केलेल्या विकासाच्या नावाने प्रकल्पग्रस्त गावांचा मात्र भकास केल्याचे चित्र द्राेणागिरी नोड मधील नवघर गावासह परिसरात पाहावयास मिळत आहे. नव्यामुंबई शहराचे शिल्पकार म्हणून टेंभा मिरवणा-या सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या सहका-याने येथील ज्या गावांच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने जबरदस्तीने घेऊन येथील प्रकल्पग्रस्त गावांना शाळा, रस्ते, नाले, वीज, पाणी इत्यादी अनेक विकासाची तसेच सुख – सुविधांची खोटी आमिषे देऊन स्वत:चा विकास करण्यापलिकडे सिडकोने काहीच केले नसून प्रकल्पग्रस्त गावांना मात्र वेठीस धरून गावा-गावात भांडणे लावण्याचं काम मात्र सोईस्कररित्या केले असल्याचे बोलके चित्र उरण मधील अनेक गावात आजही दिसते.

दिनांक 14/6/2022 रोजी उरण येथील नवघर गावात वटपौणिमा सणाच्या दिवशी समुद्राच्या भरतीचे पाणी नवघर गावात शिरल्यामुळे सिडकोचे द्रोणागिरी नाेडचे अधिकारी एच. डी. नहाने हे पाहणी करण्यासाठी आले असता नवघर गावात त्यांना घराघरात पाणी गेल्याचे चित्र पाहवयास मिळाले. यावेळी ग्रामस्थांना दिडशे वर्षा पुर्वीचा इतिहासातील इंग्रजांचा आपल्या देशावर केलेला राज्याच्या इतिहासातील धड्याची आठवण झाली. इंग्रजांनी भारतीयांमध्ये आपल्या – आपल्यातच भाडंणे लावून राज्य केले. तशीच राजनीतिचा काहीसा प्रकार सिडको येथील ग्रामस्थांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार करतोय की काय असे ग्रामस्थांना जाणवत होते. पावसाळ्या अगोदर गावा सभोवतालीची नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी सिडकोची असताना पावसा अगोदरच जर समुद्राच्या भरतीचे पाणी गावात शिरत असेल तर पावसाळ्यात काय अवस्था होईल हे फक्त ए.सी ऑफिस मध्ये बसून रेखाटणी करणारे कर्तव्यदक्ष सिडकोचेच अधिकारी सांगू शकतील. असो दर वर्षी हेच चित्र नवघर गावातील ग्रामस्थांना पाहवयास मिळत असल्याने घरात बसून सिडकोच्या नावाने शिमगा केल्या शिवाय काहीच पर्याय नाही पण सिडकोला जर थोडीशी जरी लाज असेल तर पावसाच्या पुराचे तसेच समुद्रच्या भरतीचे पाणी गावात येणार नाही याची दक्षता घेऊन उपाययोजना करावी ऐवढीच नवघर ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि ती इच्छा ग्रामस्थांनी सिडकोच्या अधिका-यां जवळ बोलून दाखवली. यावेळी नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील, रायगड भुषण प्रा. एल. बी. पाटील, नवघर ग्रामपंचायत उपसरपंच रवीशेठ वाजेकर, नवघरपाड्याचे अध्यक्ष विनोद बंडा, हसुराम भोईर, नवघर ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार अमीत जोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, रवीशेठ पाटील, महेद्र एन. ठाकुर यांच्या सहित ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *